सैनिकी विद्यालयात महावीर जयंती उत्साहात साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महावीरांचा संदेश विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सैनिक विद्यालयात जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख धनराज काटू, प्रा. नितीन पाटील, संगणक निदेशक विजय कावळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धनराज काटू आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर होते. त्यांनी अहिंसा, अचौर्य, असत्य, अस्तेय ,अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते सांगितली आहेत.जैन धर्माचा प्रसार ,प्रचार त्यांनी संपूर्ण भारतभर फिरुन केला.
अध्यक्षिय समारोपात पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के म्हणाले, वर्धमान महावीर यांनी चोरी करू नये ,जास्त संपत्तीचा संचय करू नये ,नेहमी खरे बोलावे, जीवनामध्ये कायम अहिंसा या तत्त्वाचा अवलंब करावा. व ब्रह्मचर्याचे पालन करावे हा संदेश जगाला दिला. वर्धमान महावीर यांचे स्मरण करण्या साठी महावीर जयंती साजरी केली जाते.
विद्यालयातील विद्यार्थी पियुष गिरी, आदित्य वायभासे , रेवणनाथ मनसटवाड, विश्वनाथ मुखेडे , शेखर साबणे पृथ्वीराज इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन पाटील यांनी केले तर आभार विजय कावळे यांनी मानले.
