शैक्षणिक प्रगतीसाठी दुर्बल घटकांना सहकार्य – ऍड. वर्षा पंकज कांबळे

उदगीर (एल.पी.उगिले) विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला विकासाचा मूलमंत्र देताना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगितले आहे. मात्र सध्याच्या काळात शिक्षण घेणे सर्वसामान्यांना आणि गरिबांना अशक्यप्राय गोष्ट झाल्यामुळे गरीब घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करावी, या भावनेतून विद्या विजय सेवाभावी संस्थेच्या वतीने आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श तरुणांनी पुढे ठेवून, समाजसेवेच्या माध्यमातून जयंती साजरी करावी. असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या विधीज्ञ वर्षा पंकज कांबळे यांनी केले आहे.
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी तहसीलदार राम बोरगावकर, राहुल केंद्रे,भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष मनोज पुदाले, पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, पोलीस निरीक्षक गाडे, तलाठी पंकज कांबळे यांच्यासह गांधीनगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना वर्षा कांबळे म्हणाल्या की, सामाजिक जाणीव प्रगल्भ करून समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत. राज्यघटनेमध्ये समतेचा महत्त्वाचा मुद्दा जरी असला तरीही दुर्दैवाने गरिबी आणि श्रीमंतीची दरी अजूनही मिटलेली नसल्याने, गरिबांना उपेक्षित नजरेने पाहिले जाते. तसेच आर्थिक विवंचनेमुळे गरीब विकासाच्या प्रवाहात सहजासहजी येऊ शकत नाहीत, त्यांना सहकार्य करण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे, आणि शिक्षणासाठी सहकार्य व्हावे. या उदात्त्य हेतूने विद्या विजय सेवाभावी संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शहरातील गरजू विद्यार्थी आणि गांधीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.