उर्दूवर प्रभुत्व मिळवणे काळाची गरज- शेख मेहबूब
उदगीर (एल पी उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बझ्म-ए-उर्दू अदब या साहित्यिक मंचाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रा. शेख मेहबूब यांनी सध्याच्या काळात उर्दू भाषेतील कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या युगात उर्दू भाषा सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहे, आणि विद्यार्थ्यांसाठी करिअरची अनेक दारे खुली आहेत. शिक्षणक्षेत्रातील संधींपलीकडे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतही संधी प्राप्त करता येते, मातृ भाषेवर प्रभुत्व आवश्यक आहे. जगीरदार महमूद अली यांनी कॉलेजच्या उर्दू विभागाची अलीगढ मुस्लिम विद्यापीठाशी झालेल्या अनुभूतीची तुलना केली, आणि विभागातील १६ विद्यार्थ्यांनी एम.ए. आणि पीएच.डी.च्या पदवी मिळविल्याचा उल्लेख केला. यावेळी “फिक्र-ए-नो” या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते झाले. पत्रिकेच्या संपादक अत्तर अफशां गझल, शेख बरेरा आणि सय्यदा सानिया यांचे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर.के. मस्के यांनी उर्दू भाषेच्या मधुरतेचा उल्लेख केला आणि विभागातील सततच्या उपक्रमांमुळे इतर विभागांना प्रेरणा मिळते असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात हाशमी सैयद जुबैर यांच्या कुराण पठणाने झाली आणि स्वागतगीत, पाहुण्यांचा परिचय, तसेच विविध भाषणांनी सभेला रंगत आणली. विभागप्रमुख प्रा. हमिद अश्रफ यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची प्रशंसा केली आणि उर्दू भाषेच्या नाजूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे संचालन पठाण इर्शाद वसीम आणि पठाण आसिया वसीम यांनी केले तर आभार पठाण शफीया यांनी मानले.
