अतिवृष्टीमुळे आनंदवाडी-सुनेगाव जोड रस्त्यावरील पूल वाहुन गेला; उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी
अहमदपूर( गोविंद काळे ): गेल्या काही दिवसांपासून अहमदपूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आनंदवाडी-सुनेगाव जोड रस्त्यावरील मन्याड नदीवरील पूल वाहून गेला आहे. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी (एसडीओ) मंजुषा लटपटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित उपअभियंत्यांना तात्काळ पुलाची डागडुजी करण्याचे निर्देश दिले.
यासोबतच त्यांनी सांगितले की, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन पूल आणि पक्का रस्ता तसेच साईड पिचिंग व नाल्यासह एक सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल. भविष्यात दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अभियंता एस एस पाटील, कनिष्ठ अभियंता ए एस शेख, कनिष्ठ अभियंता अजय पांचाळ, सुनेगाव (शेंद्री) येथील सरपंच पती तथा शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये, राम जायभाये, श्रीकांत केंद्रे, पत्रकार बालाजी काळे आणि गोविंद काळे आदी उपस्थित होते.
