‘ऑपरेशन सिंदूर’च्या कृतज्ञतेसाठी 500 विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र
अहमदपूर ( गोविंद काळे ): जागतिक टपाल दिनानिमित्त (9 ऑक्टोबर) अहमदपूर येथील यशवंत विद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे दिलेल्या प्रत्युत्तरासाठी, विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
विद्यालयातील कलाशिक्षक महादेव खळुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. खळुरे यांनी विद्यार्थ्यांना ५०० पोस्टकार्ड उपलब्ध करून दिली आणि पत्रलेखनाबाबत माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही टपाल सेवेचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी देशाचे पंतप्रधान, संरक्षण विभाग, गृहमंत्री आणि भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ही सर्व पोस्टकार्ड पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत.
जागतिक टपाल दिनानिमित्त (9 ऑक्टोबर) टपाल सेवेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, तसेच देशाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सैन्याप्रती आदर व्यक्त करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते, असे विद्यालयाने सांगितले.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे संस्थेचे सचिव डी.बी. लोहारे गुरुजी, अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगविकर यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.
