लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आता लखपती दीदी योजना प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री फडणवीस
उदगीर (एल.पी.उगिले) जोपर्यंत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत. तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, याउलट या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याची योजना आहे. उदगीर शहरातील हजारो लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याची जबाबदारी आता स्वाती हुडे यांच्यावर आहे. भारतीय जनता पक्ष लोकाभिमुख पक्ष असून विकासासाठी सदैव अग्रेसर आहे. विकासाचा रथ कायम पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते उदगीर येथील दसरा मैदान, तालुका क्रीडा संकुल येथील मैदानावर आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खुबा, माजी मंत्री तथा आ. संजय बनसोडे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश आप्पा कराड यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख, राजेश्वर नीटुरे, रामभाऊ तिरुके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उत्तराताई कलबुर्गे, अमोल निडवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उदगीर नगर परिषदेच्या महायुतीच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे, यांच्यासोबतच औसा, रेनापुर, अहमदपूर आणि निलंगा येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवारांची ही उपस्थिती होती.
प्रास्ताविक भाषणामध्ये संयोजक आ. संजय बनसोडे यांनी मंत्री पदाच्या काळात केलेल्या विविध विकास कामाचे आणि उदगीर शहरासाठी खेचून आणलेल्या निधीची माहिती देऊन आपण केलेली विकास कामे सांगितली.
त्याचाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदगीरचे आमदार संजय बनसोडे फार हुशार आहेत. उदगीरकरांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय कार्यालये जंगी इमारतीमध्ये थाटली आहेत. जेव्हा केव्हा राज्यामध्ये नवीन जिल्हा निर्मितीचे धोरण जाहीर होईल त्यावेळेस उदगीर अग्रक्रमाने जिल्हा होईल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय संविधान खूप प्रभावशाली आहे. पूर्वी राजाच्या पोटी जन्माला येणारा राजा बनत होता. आता मतदार आपला राजा स्वतः निवडून देत आहे. उदगीरचे सुज्ञ मतदार विकासाचे गांभीर्य विचारात घेऊन चालू असलेला विकास आणखी गतिमान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करतील. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चौकट……
भारतीय जनता पक्षामध्ये मान्यवरांचा जाहीर प्रवेश…
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲड. त्र्यंबक नाना भिसे, लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी उदगीर येथील सभेत आपल्या समर्थकासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनीही घर वापसी केली. याप्रसंगीत अनेक कार्यकर्त्यांनीही वेगवेगळ्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ही प्रवेशाची गर्दी पाहून भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य निश्चितच वाढत चालले असल्याचे चर्चिले जात आहे.
