बंधुत्व हा संविधानाचा आत्मा – प्रा.डॉ.विश्वंभर गायकवाड
उदगीर (एल पी उगिले)बंधुत्वाविना स्वातंत्र्य,समता व न्याय या मुल्यांना काही अर्थ नाही. बंधूभावातूनच राष्ट्र निर्माण होऊ शकते. अन्यथा समताधिष्ठित समाज निर्माण होणार नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात बौद्ध तत्वज्ञानातून बंधुत्व हे मूल्य घेतले. बंधुत्व हा संविधानाचा आत्मा आहे. असे मत छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.विश्वंभर गायकवाड यांनी मांडले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे हे होते. यावेळी मंचावर स्टाफ सेक्रेटरी प्रा.व्ही.आय. पवार, माजी ग्रंथपाल बाबुराव माशाळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक संविधान उद्देशिका वाचून करण्यात आले ,तर स्वागतगीत कु. श्रद्धा नागरगोजे यांनी सादर केले. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.दत्ताहरी होनराव यांनी केले.
पुढे बोलताना डॉ.विश्वंभर गायकवाड म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर बंधुत्वाला संविधानाचा आत्मा मानत होते. त्यांनी बंधुत्वाची व्याख्या सर्व भारतीयांमध्ये समान बंधुत्वाची भावना अशी केली, जी जात, धर्म आणि प्रदेशाच्या पलीकडे एकता वाढवते. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेला दिलेल्या त्यांच्या शेवटच्या भाषणात त्यांनी इशारा दिला की, बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समानतेचे आदर्श पोकळ राहतील. असे अभ्यासपूर्ण संविधान सभेतील चर्चा बी.एन. राव यांनी संविधानाचा मांडलेला कच्चा मसुदा २४३ कलमे व १३ परिशिष्टचा असे दाखले देत संविधान सभेतील चर्चेअंती जशीच्या तशी फक्त दोन कलमे उरली असे सांगितले. भारतीय संविधान सभेतील विविध मतप्रवाहामुळे चर्चेतून जगातील सर्वोत्कृष्ट संविधान साकार झाले. आपले संविधान अलीकडे १९९६ आलेल्या दक्षिण आफ्रिकाच्या संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे. असे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे यांनी संविधानाची उद्देश पत्रिका व संविधानाचे महत्व लक्षात घेऊन असे कार्यक्रम झाले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
यावेळी प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनराज बंडे यांनी तर आभार प्रा. बालाजी राठोड यांनी मानले.
