मानवी हक्क संरक्षणासाठी १९७१ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध युद्ध केले – डॉ दत्ताहरी होनराव
उदगीर (एल पी उगिले) शेजारी राष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटला जात होता, एक कोटी निर्वासित भारतात आले होते. म्हणून सन १९७१ मध्ये मानवी हक्क संरक्षणासाठी भारताने पाकिस्तान विरुद्ध युद्ध केले. त्यात भारताने पाकिस्तानवर दि १६ डिसेंबर १९७१ रोजी निर्णायक विजय मिळवला व बांग्लादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली, म्हणून हा दिवस आपण विजय दिवस म्हणून साजरा करतोत, असे अभ्यासपूर्ण विचार श्री हावगीस्वामी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दत्ताहरी होनराव यांनी मांडले.
ते जिव्हाळा ग्रुपच्या वतीने आयोजित विजय दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माफसूचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने हे होते. तर मंचावर १९७१च्या युद्धातील सैनिक लक्ष्मणराव नागलगावे, जिव्हाळा ग्रुपचे उपाध्यक्ष अशोक बिरादार व सत्कारमूर्ती लक्ष्मीकांत बिडवई हे होते.
पुढे बोलताना डॉ होनराव म्हणाले की, १९ ७१ च्या युद्धातील विजय हा धर्माधिष्ठित राज्याचा पराभव व धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा विजय आहे. अमेरिकेच्या सातव्या आरमाराच्या धमकीला न जुमानता भारत- रशिया कराराच्या जोरावर इंदिरा गांधींच्या धुरंधर नेतृत्वाखाली पाकिस्तानवर मात करून द्विपक्षीय सिमला करार केला. त्यात इतर कुठल्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता. हे या विजय दिनाच महत्व समजून घेतलं पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अनिल भिकाणे म्हणाले की, जगात जिथे धर्माधिष्ठित राष्ट्र आहेत. तेथे अशांतता आहे, हुकूमशाही- लष्करशाही आली आहे, त्यांचे विभाजन होत आहे. मात्र भारत हा देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे शांतता व लोकशाही टिकून आहे. देशाची एकात्मता टिकवायची असेल तर समाजातील बंधुता टिकली पाहिजे.आपसातील हेवेदावे विसरुन एकात्म भाव जपला पाहिजे, असे भावनात्मक आवाहन केले.
अशोकराव बिरादार यानी वाढदिवसा निमित्त लक्ष्मीकांत बिडवई याना गौरवपूर्ण शब्दात शुभेच्छा दिल्या .
विजय दिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्यदलात २४ वर्ष सेवा दिलेले व १९७१ च्या भारत पाक युद्धात सहभागी असलेले माजी सैनिक लक्ष्मणराव नागलगावे यांना जिव्हाळा सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर जिव्हाळा ग्रुपचे सदस्य तथा स्वंयसेवी संस्थाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे लक्ष्मीकांत बिडवई यांचा वाढदिवसा निमित्त यथोचित सत्कार करण्यात आला. माजी सैनिक हरिश्चंद्र वट्टमवार व रोडगे यांचाही सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलराव फुलसे यांच्या देशभक्तीपर गीताने झाली. प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथराव मुडपे, सुत्रसंचलन रमाकांत बनशेळकीकर तर आभार प्रदर्शन वैजनाथ पंचगल्ले यांनी केले.
कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिव्हाळा ग्रुपचे सचिव अशोक दारनुळे , कोषाध्यक्ष शंकर केंद्रे, बाबुराव वाघमारे, ज्ञानोबा कोटलवार यानी परिश्रम घेतले.कार्यक्रमास बालरोगतज्ञ डॉ महेश भातांब्रे , दंतचिकित्सक डॉ संदिप सोनटक्के , डॉ संगमेश्वर दाचावार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर , विश्वनाथराव माळेवाडीकर, प्रा दिपक पाटील, डॉ रमेश बिरादार , अमृतराव देशपांडे , सोपानराव माने , शंकरराव साबणे , सच्चीदानंद पुठ्ठेवाड , शरणप्पा खेळगे, दिलिप कंधारे , मनोहर खिंडीवाले , रामराव मोमले , दिलीप भोसले , मंगेश कोडगिरे , धनाजी भोसले यांचे सह जिव्हाळा व मैत्री ग्रुपचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
