डिजिटल क्रांतीतूनच भ्रष्टाचारमुक्ती शक्य; पोलीस अधीक्षक अमोल तांबे
लातूर (एल पी उगिले)
“शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा केवळ सोय नसून, भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे ते एक उत्तम हत्यार आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने तंत्रज्ञानाचा वापर करण्याला प्राधान्य द्यावे,” असे रोखठोक प्रतिपादन लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘सुशासन सप्ताह’ व्याख्यानमालेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह जिल्हयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
तंत्रज्ञान आणि पारदर्शकता:
जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे महत्त्वाचे मुद्दे भ्रष्टाचार निर्मूलन: तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेप कमी होतो, पर्यायाने भ्रष्टाचाराला आळा बसतो.
मोबदला स्वीकारणे हा गुन्हा: सरकारी कामाच्या बदल्यात आर्थिक, वस्तू किंवा इतर कोणत्याही स्वरूपात लाभ घेणे हा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे.
लोकसेवक भावना: जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, हे भान प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवणे आवश्यक आहे.
सुलभ आणि गतिमान सेवेचा संकल्प-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, “नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक सुलभ आणि जलद व्हाव्यात हाच सुशासन सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आपल्या विभागातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जाणीवजागृती करावी.”
या उपक्रमासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पवार, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, अहिल्या गाठाळ, संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड आणि जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली ठाकूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी के शव नेटके यांनी मानले.
