देशी दारूच्या दुकानासमोर खूनउच्च न्यायालयात जामीन मंजूर
उदगीर (एल पी उगिले)
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठामधील न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांनी आरोपी अल्बक्ष नबीसाब पठाण याला काही अटी व शर्तीवर खून खटल्याच्या प्रकरणी नियमित जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी आयशा गौस पठाण यांनी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचे पती गौस नुरमुहम्मद पठाण यांचा खून केल्याच्या आरोपातील आरोपी अल्बक्ष नबीसाब पठाण आणि जमीर या दोघांनी वाघमारे देशी दारू दुकान उदगीर या दुकानाच्या समोर भांडणात खून केलेला आहे, या आशयाची फिर्याद उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे दिली होती. सदर फिर्यादीअंती पोलिसांनी गुन्हा दाखल केला व गुन्हा दाखल करून दोषारोप दाखल केले. मूळ दोषारोप दाखल केल्यानंतर आरोपी यांनी सत्र न्यायालय उदगीर येथे जामिनासाठी अर्ज केला असता सत्र न्यायालय उदगीर यांनी सदर जामीन अर्ज फेटाळून लावला.
सदर नाराजीने आरोपी अल्बक्ष नाबीसाब पठाण यांनी उच्च न्यायालयात नियमित जामीन अर्ज क्र. १९२२/२५ अन्वये ॲड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज सादर केला. सदर प्रकरणीच्या सुनावणीवेळी ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर प्रकरणातील जास्तीत जास्त साक्षीदार हे ऐकीव साक्षीदार आहेत. सदर ऐकीव साक्षीदारांच्या जबानीवर आरोपीने गुन्हा केला असे सिद्ध होणे शक्य नाही. तसेच सदर प्रकरणी एकमेव प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार म्हणजे सदर देशी दारू दुकानातील वेटर शिवाजी भासगे याच्या दिलेल्या जबानीचे सूक्ष्म अवलोकन केले असता, शिवाजी भासगे त्याच्या साक्षीमध्ये तो म्हणतो की, आरोपी अल्बक्ष नबीसाब पठाण हा भांडण सोडवत होता. तथापि वरील साक्षीचे सूक्ष्म अवलोकन केले असता, सदरील आरोपीचा मयताचा खून करण्यामागे मुख्य भूमिका होती असे कोठेही दिसून येत नाही.
या आशयाचा युक्तिवाद उच्च न्यायालयासमोर ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी मांडला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन एस.देशमुख यांनी सदर युक्तिवाद मान्य करून आरोपीची काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर केली व आरोपीला जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत.
सदर प्रकरणी ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पहिले व त्यांना ॲड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.
