राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सी पी आय या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सी पी आय या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशभरात डावी आघाडी बनवण्यासाठी अग्रेसर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस, शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सह सी पी आय या राष्ट्रीय पक्षांचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. आता हे पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून राहणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आणि त्यादृष्टीने सर्वपक्षीयांची तयारी सुरु असतानाच राष्ट्रवादीसह तृणमुल काँग्रेस व सी.पी.आय. पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सी.पी.आय. या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे.तर दुसरीकडे देशभरात लोकांच्या मनात भरणारी कामगिरी करणाऱ्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल थोडक्यात माहिती अशी,राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना २० जून १९९९ रोजी झाली. पुढच्या वर्षभरात म्हणजेच १० जानेवारी २००० रोजी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता.पक्षाने पुढची १३ वर्ष कसून मेहनत केली.लोकप्रतिनिधी निवडून आणण्यावर भर दिला. मात्र अचानक देशात मोदी लाट निर्माण झाली आणि शरद पवारांचा प्रभाव महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर कमी झाला.
पुढची नऊ वर्ष पक्षाची कामगिरी डळमळीत होत गेली. २०१४ नंतरच्या कामगिरीमुळे तर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आला.
नागालँडचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन सुद्धा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकत नाही, असे सांगत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलाआहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक प्रवास असा आहे,१९९९ ला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १३२ जागा लढवल्या,
त्यातील एकूण ८ उमेदवार निवडून आले होते.६ महाराष्ट्रातून तर मेघालयमध्ये १, मणिपूरमधून १ खासदार निवडून आलेला होता.२००४ ला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ३२ जागा लढवल्या,त्यापैकी ९ उमेदवार निवडून आले, मात्र महाराष्ट्राबाहेर एकही उमेदवार निवडून आला नव्हता. २००९ ला राष्ट्रवादीने लोकसभेत ६८ उमेदवार उतरवले मात्र ९ उमेदवार निवडून आले होते, त्यापैकी ८ महाराष्ट्रातून तर मेघालयमधून १ खासदार निवडून आला होता.२०१४ ला आलेल्या मोदी लाटेचा मोठा तडाखा महाराष्ट्रात संयुक्त पुरोगामी आघाडीला बसला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून फक्त ४ खासदार निवडून आले होते.२०१९ ला राष्ट्रवादीने ३४ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी फक्त पाच उमेदवार निवडून आले,४ खासदार राज्यसभेत निवडून गेले,
सध्या ५४३ सदस्य संख्येपैकी राष्ट्रवादीचे फक्त ५ खासदार आहेत.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी पक्षांना कोणते निकष पाळावे लागतात?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकां मध्ये ६ टक्के मत आवश्यक आहेत, ते चार किंवा अधिक राज्यांमध्ये मिळवली पाहिजेत.लोकसभा निवडणुकीत चार जागांवर त्या पक्षाला कोणत्याही राज्यात विजय मिळवता आला पाहिजे.
लोकसभा निवडणुकीत २ टक्के जागांवर विजय मिळवता आला पाहिजे, आणि ते विजयी उमेदवार तीन वेगवेगळ्या राज्यातून विजयी झालेले असणं आवश्यक आहे.
चार राज्यांमध्ये संबंधित पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा असने आवश्यक आहे. असा निवडणूक आयोगाचा दंडक आहे. या नवीन निर्णयामुळे राजकीय समीकरणे काय राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author