एसटी कर्मचाऱ्यांचा संप; अहमदपूर आगाराचे ५ कोटी ३६ लाखांचे उत्पन्न बुडाले!

एसटी कर्मचाऱ्यांचा संप; अहमदपूर आगाराचे ५ कोटी ३६ लाखांचे उत्पन्न बुडाले!

६० कर्मचारी निलंबीत २ कर्मचाऱ्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटिसा

अहमदपूर (गोविंद काळे) : एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच असून, आता महामंडळ प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. अहमदपूर आगारागातील ६० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबीत करण्यात आले असून २ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलावर आहे.एस.टी. महामंडळाचा शासन सेवेत समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एस.टी. महामंडळाचे कर्मचारी नोव्हेंबर महिन्यापासून संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एस.टी. बससेवा ठप्प झाली आहे.गेल्या ६७ दिवसांपासून एसटी
महामंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असल्याने बससेवा ठप्प आहे.परिणामी, खाजगी वाहतूक जोमात सुरु आहे. खाजगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्याबरोबरच अधिक प्रवासभाडे आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. राज्य शासनाने एसटी बसेस सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे.यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास ६७ दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. परिणामी, एसटी बस बंद असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे.
एसटी बससेवा बंद असल्याने अनेक प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. अहमदपूर आगारातील बसेस एकाच जागेवर थांबून आहेत.

संपात ४७१ कर्मचारी सहभागी

अहमदपूर आगारातून ६७ दिवसांपासून ६६ बसेस पैकी एकही बस बाहेर पडू शकली नाही. आगारात १७३ चालक व २०० वाहक, मेकॅनिक ५९, प्रशासकीय ३९ एकूण ४७१ कर्मचारी आहेत. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
अहमदपूर आगाराचे रोजचे उत्पन्न ८ लाख रुपये असून ६७ दिवसांत ५ कोटी३६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ६७ दिवसांपासून एस.टी.ची चाके थांबल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ६७ दिवसांपासून आगारात शुकशुकाट दिसून येत आहे. एसटीच्या संपामुळे अचानक खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी प्रवासी संख्या वाढल्याने दरवाढ करीत मनमानी भाडे घेत आहेत.

विद्यार्थ्यांची मोठी अडचण

शहरासह ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, बसेस बंद असल्याने दररोज परगावी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी घरीच थांबत आहेत. एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून दिले जाते. आंदोलनामुळे या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

खाजगी वाहन चालकांकडून होतेय आर्थिक लूट

गेले ६७ दिवस झाले तरी संप सुरूच असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहनांचा शोध घ्यावा लागत आहे. शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशी नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. शासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मुभा दिली आहे. मात्र, या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून मनमानी प्रवासभाडे आकारले जात असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे सलग ६७ दिवसांपासून प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था कोलमडली आहे.

शासनातर्फे कर्मचाऱ्यांवर निलंबनाची, बडतर्फ करण्याची कारवाई सुरू आहे. शासनाने कर्मचाऱ्यांची पगारवाढ केलेली आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होऊन आपल्या मागणीचा लढा सुरू ठेवावा. हे सर्व प्रकरण न्यायाळ्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होऊन प्रवाशांना सेवा देत आपला लढा कायम ठेवावा. सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना कोंडीत न पकडता संप सुरू ठेवावा.
एस.जी. सोनवणे
आगारप्रमुख

About The Author

error: Content is protected !!